तस्लिमा नसरिन योग्यच बोलल्या!

•चौफेर : अमर पुराणिक•
सर्व थरातून भारताच्या ऐक्याला, विकासाला बाधा आणण्याचे उद्योग अतिरेक्यांप्रमाणेच हे सेक्यूलरवादीही करत आले आहेत. तस्लिमा नसरिन यांनी अशा आस्तिनातील निखार्‍यांच्या मुस्काटात मारली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. कारण या विषयावर थेट बोलण्याचे धाडस बहूदा आजपर्यंत कोणी केलेले नसावे. पहिल्यांदाच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कणखर सरकार भारताला लाभल्यामुळे तस्लिमा नसरिन यांनी बोलण्याचे धाडस केले. तस्लिमांना हा विश्‍वास आहे की मोदी अयोग्य वागणार नाहीत म्हणूनच त्या हा गंभीर विषय बोलल्या. तस्लिमा नसरिन यांनी ढोंगी सेक्यूलरवादाचे बींग फोडून भारताचे हीतच साधले आहे.
प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी नुकताच भारतातील सेक्यूलरवाद्यांच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या खेळीचा बुरखा फाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आता ही सेक्यूलरवाद्यांची नवी फळी कार्यरत झाली आहे. प्रत्येक गोष्टीला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत असे ठासून सांगण्याचा अट्टाहास या लोकांनी चालवला आहे. या आधी गेल्या १४-१५ वर्षापासून अनेक सेक्यूलरांच्या झुंडी कल्पोकल्पित आरोप करता करता गारद झाल्या, आता ही सेक्यूलर लेखकांची नवी फळी विरोधात उतरली आहे. मुळात या ढोंगी धर्मनिरपेक्ष सेक्यूलरांना मोदींचे विरोधक म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादाचे, भारताचे विरोधक म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल.
तस्लिमा नसरिन या अतिशय उत्तम लेखिका आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या तस्लिमा यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच लिखाणाचे आणि समाजसेवेचे व्रत घेतले. १९८० च्या दशकात त्यांची सहित्यिक कारकीर्द सुुरु झाली. त्यांच्या स्त्रीवादी लेखनामुळे त्यांचा खूप नावलौकिक झाला. विशेषत: मुस्लिम समाजातील दोषांवर त्यांनी आसूड ओढले. त्यांच्या इस्लामविरोधी लेखनामुळे त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागला, देशही सोडावा लागला. त्यांनी ‘लज्जा, ओपोरपोक्ष, निमोंत्रोन, फेरा, अमार मेयेबेला, द्विखंडितो, उतल हवा’ अशा एका पेक्षा एक वरचढ कलाकृती सादर केल्या आहेत. तस्लिमांच्या अनेक पुस्तकांवर बंदी घालण्यात आली आहे. मराठीसह अनेक भाषांत त्यांच्या पुस्तकांचे भाषांतर करण्यात आले आहे. तस्लिमा नसरिन यांना त्यांनी ओढलेल्या इस्लामवरील आसूडामुळे त्यांना बांगलादेश सोडून बाहेर पडावे लागले. भारतावर त्यांचे विशेष प्रेम असल्यामुळे त्यांनी भारतात राहणे पसंत केले. पण भारतातील सेक्यूलर सरकारने त्यांना कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिलेली नव्हती. असे असले तरीही त्यांनी समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करणे सोडलेले नाही.
भारतातही त्यांना मुसलमानांकडून थेट विरोध झाला तर तथाकथित धर्मनिरपेक्ष सेक्यूलरांनी त्यांचा छूपा विरोध केला. मागे त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन हैदराबाद येथे झाले होते, तेव्हा काही मुस्लिम समाज कंटकांनी त्यांच्यावर हल्ला केला व प्रकाशन समारंभ बंद पाडला. याहून दुदैवी बाब म्हणजे सेक्यूलरवादाचा पुरस्कार करणारे अनेक पुरोगामी विद्वान त्यावेळी मुग गिळून गप्प बसले होते. त्यांचा सेक्यूलरवाद नेमका अशावेळी कोठे पेंड खायला गेला होता? गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा सपाटा लावला आहे. कशासाठी? तर मोदींच्या विरोधासाठी. या तथाकथित विद्वानांच्या मते भारतातील स्थिती कधी नव्हे इतकी चिघळली आहे. यांच्या मते गेल्या साठ वर्षांत भारताची स्थिती अतिशय चांगली होती, पण भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून स्थिती ढासळली आहे. समाजात खूप असहीष्णूता पसरली आहे. आता अशा या विद्वानांना काय म्हणावे? हे या देशातच राहतात का? असा प्रश्‍न निर्माण होतो. की यांच्या नियतीतच खोट आहे?
कारण कधी नव्हे इतकी देशाची सध्या समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे मग अशा सेक्यूलर पुरोगाम्यांना कोणते मुद्दे मिळेनासे झाले आहेत. म्हणून थोडे कोठे खूट्ट झाले की माध्यमे आणि ही तथाकथित विद्वान सेक्यूलर लेखक मंडळी ओरड करायला सुरुवात करतात. राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करायचा आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. यातूनच ही पुरस्कार परत करण्याची नौटंकी सुरु आहे. पुरस्कारांचा मोदी सरकारशी काहीही संबंध नसताना मोदी सरकारला झोडपण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. हे पुरस्कार मोदी सरकार देत नाही तर केवळ पुरस्काराची रक्कम सरकारकडून साहित्य अकादमीला प्राप्त होते. मग हे लोक पुरस्कार परत आहेत, पण पुरस्काराची रक्कम परत केली असे अजून कोणाचे नाव ऐकायला मिळाले नाही. यांचा रोष अकादमीवर नसून सरकारवर असेल तर यांनी पुरस्काराची रक्कम परत करायला हवी ना? मुळात यातील पुरस्कारप्राप्त लेखकांना ९९ टक्के सामान्य भारतीय नागरिक ओळखत देखील नाहीत. मग यांना पुरस्कार मिळाले कशाच्या आधारावर? असा प्रश्‍न सामान्य भारतीयांच्या मनात उभा राहणारच.
क्षमता, विद्वत्ता नसलेल्या तिनपाट लेखकांचा हा धंदाच झाला आहे. पहिल्यांदा वशिलेबाजी, लांगुलचालन करुन पुरस्कारासाठी वर्णी लावून घ्यायची नंतर पुरस्कार परत करून वादळ निर्माण करुन प्रसिद्धी मिळवायची. मुळात हा मुद्दा येवढ्‌यावर मर्यादीत रहात नाही. तर यामागे विदेशी प्रवृत्तीचा हात आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
तस्लिमा नसरिन यांनी बेडगी धर्मनिरपेक्षवाद्यांच्यावर्मावर नेमके बोट ठेवले आहे. तस्लिमांनी हेच सांगितले आहे की, ही तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळी सेक्यूलरवादाच्या नावाखाली हिंदूत्वावादाचा विरोध करतात आणि इस्लामिक दहशतवादाचा बचाव करतात. हीच का यांची धर्मनिरपेक्षता? भारतातल्या ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांवर तस्लिमा नसरिन यांनी जोरदार आसूड ओढला आहे आणि तो योग्यच आहे. कारण भारतातील सेक्यूलर विचारवंत, कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमुल कॉंग्रेस, कम्यूनिस्ट पार्टी आणि प्रसारमाध्यमे कट्टरवादी मुस्लिमांच्या दहशतवादी कृत्यांचे समर्थन राजरोसपणे करत आहेत. याकूबच्या फाशीनंतर आपण सर्व भारतीयांनी हे चित्र स्पष्टपणे पाहिले आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते अशा दहशतवाद्यांचे आदरार्थी संबोधन करतात. सोशल मिडियावर यावर प्रचंड राळ उठली होती. कसाबजी, लादेनजी असे दहशतवाद्यांचे संबोधन करताना यांना लाज कशी वाटली नव्हती. हाच संताप तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केला आहे. मुस्लिम मतांवर डोळा ठेवून दहशतवाद्यांचे समर्थन करणे हे अतिशय घृणास्पद कृत्य आहेच पण त्याहीपेक्षा जास्त हा भारतातील राष्ट्रवादी मुस्लिमांचा, भारतावर प्रेम करणार्‍या मुस्लिमांचा हा घोर अपमान आहे.
तस्लिमा नसरिन यांनी पश्‍चिम बंगालमधील उदाहरण सांगितले आहे, की पश्‍चिम बंगालमध्ये अनेकदा शेकडो हिंदूच्या घरांना आगी लागल्या गेल्या तेव्हा हे सेक्यूलर लोक काहीच बोलले नाहीत. पण हेच जर एखाद्या मुसलमानाबाबत घडले असते तर सारेच सेक्यूलर पेटून उठले असते. सेक्यूलरवाद्यांनी अशी विकृत नीती केवळ पश्‍चिम बंगालमध्येच राबवलेली नाही तर संपुर्ण भारतात कोठेही हिंदूंवर अन्याय झाला तर ही धर्मनिरपेक्षवादी मंडळी तोंडाला कुलुप लावून गप्प बसतात. पण एखाद्या मुस्लिमाच्या राष्ट्रद्रोही कृत्याचे उघड-उघड समर्थन करताना यांचा धर्मनिरपेक्षवाद कोठे जातो? ही सेक्यूलर मंडळी भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो असा खोटा धिंडोरा जगभर पिटण्याचाच प्रयत्न करत असतात. तस्लिमा नसरिन म्हणाल्या ते तंतोतंत खरे आहे. कारण जर मुस्लिमांवर भारतात अन्याय झाला असता तर ते पाकिस्तान, बांगलादेशात कायमचे रहायला गेले असते. वस्तूस्थिती मात्र याच्या उलटी आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षात लाखो बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली आहे. तर शेकडो पाकिस्तानी नागरिक भारतात, विशेषत: काश्मीरमध्ये घुसखोरी करुन कायमचे येथेच राहिले आहेत. हे सर्व भारतातील सेक्यूलरवाद्यांना चालले पण तस्लिमा नसरिन यांना कायमचे भारतीय नागरिकत्व न देण्याबाबत हे सेक्यूलर लोक कॉंग्रेसला पाठींबाच देत होतो. या धर्मनिरपेक्षवाद्यांना आणि कॉंग्रेसला देशद्रोही कृत्ये करणारे घुसखोर चालतात पण तस्लिमा नसरिन सारखी एक प्रामाणिक स्त्रीवादी लेखिका चालत नाही.
सहिष्णूतेच्या नावाखाली चालवलेले हे पुरस्कार परत करण्याचे उद्योग म्हणजे फक्त स्वहीत साधण्याचा प्रयत्न नसून यापाठीमागे मोठमोठ्‌या आंतरराष्ट्रीय संघटनांकडून पैसा उकळण्याचा धंदा सुरु आहे. गेल्या चौदा वर्षात मोदी यांच्या विरोधात तीस्ता सेटलवाड यांनी हाच उद्योग केला. रेमन मॅगॅसेस पुरस्कार मिळणारी तथाकथित लेखिका अरुंधती रॉय हीनेही हाच धंदा केला. अशी अनेक उदाहरणे आहेत. परदेशी पैशावर भारतातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम आता अशी विभूषित मंडळी करत आहेत. सर्व थरातून भारताच्या ऐक्याला, विकासाला बाधा आणण्याचे उद्योग अतिरेक्यांप्रमाणेच हे सेक्यूलरवादीही करत आले आहेत. तस्लिमा नसरिन यांनी अशा आस्तिनातील निखार्‍यांच्या मुस्काटात मारली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. कारण या विषयावर थेट बोलण्याचे धाडस बहूदा आजपर्यंत कोणी केलेले नसावे. पहिल्यांदाच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कणखर सरकार भारताला लाभल्यामुळे तस्लिमा नसरिन यांनी बोलण्याचे धाडस केले. तस्लिमांना हा विश्‍वास आहे की मोदी अयोग्य वागणार नाहीत म्हणूनच त्या हा गंभीर विषय बोलल्या. तस्लिमा नसरिन यांनी ढोंगी सेक्यूलरवादाचे बींग फोडून भारताचे हीतच साधले आहे.

0 comments:

Post a Comment