UDYOG BHARARI - LHP : SHARADKRISHNA THAKRE

पायाभूत सुविधा हा औद्योगिक प्रगतीचा प्राण : शरदकृष्ण ठाकरे
एलएचपी : एकविसाव्या शतकातील भगिरथ
 • उद्योग भरारी : अमर पुराणिक
रदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधकवृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात् ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरवणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्‍याना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागवणारी कंपनी लक्ष्मी हायड्रॉलिक्स आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणजे आजच्या युगातील भगिरथच होय!
......................................................................................................
लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि. अर्थात एलएचपीची सुरुवात केवळ १५ हजार रुपयांच्या भांडवलावर १५०० चौरस मीटरच्या भाड्याने घेतलेल्या एक पत्र्याच्या शेडमध्ये झाली. तेव्हा पहिले उत्पादन होते मोनोब्लॉक पंप. शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधक वृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि. सोलापूरच्या उद्योग क्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरविणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्‍यांना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागविणारी कंपनी लक्ष्मी हायड्रॉलिक्स आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणजे आजच्या युगातील भगिरथच होय!
लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे यांनी ‘दै. तरुण भारत’शी दिलखुलास संवाद साधताना सांगितले की, आजची एलएचपी तिच्या जन्मापूर्वीच माझ्या स्वप्नात होती. ती कालांतराने कष्ट आणि ध्यासातून प्रकट झाली. पहिल्यांदा पत्र्यांचे शेड, त्यानंतर होटगी मार्गावरील औद्योगिक वसाहत, अशी मार्गक्रमणा करीत २००२ साली चिंचोळी एमआयडीसी स्थलांतरित झाली आणि आज जगद्‌विख्यात मानांकन प्राप्त अशा भव्य प्रकल्पात साकारली गेली.धुळे जिल्ह्यातील ‘मोराणे’सारख्या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले शरदकृष्ण ठाकरे यांचे वडील प्रयोगशील, जिज्ञासू शेतकरी व व्यायामप्रिय सद्‌गृहस्थ होते. त्यांनी नापीक जमिनीचे नंदनवन करून पिके काढली; त्याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली. १९५२ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या हरितक्रांतीला प्रत्यक्ष भेट देऊन प्रशंसा केली होती. शरदकृष्ण ठाकरे यांच्या मातोश्री तर वात्सल्यमूर्तीच होत्या. त्यांनी माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांवरही तितकेच प्रेम केले. आई-वडिलांना माणसांची जाण होती. त्यांनी जोडलेली माणसे कधीच तोडली नाहीत.
शरदकृष्ण ठाकरे यांचे चार ज्येष्ठ बंधू उच्चविद्याविभूषित आहेत. बालपणापासून शरदकृष्ण ठाकरे यांना इंजिनीअर होण्याची प्रबळ इच्छा होती. नांगरापासून शेतीपंपांपर्यंत सर्व शेती अवजारे बिघडली की, दुरुस्तीची धडपड सुरू असायची. योगायोगाने पुढे मी प्रॉडक्ट निवडले तो पंपच. बालपणाच्या शेतीमैत्रीची ही परतफेडच म्हणायला हरकत नाही! हे शरदकृष्ण ठाकरे कृतज्ञतापूर्वक सांगतात.आर. अँड डी. व प्रॉडक्ट डिझायनिंगचे महत्त्व पुरेपूर जाणून असल्याने एलएचपीने सर्वात जास्त भर दिला तो ‘संशोधन व विकास कार्यावर.’ याच जोरावर आज आम्ही जवळ जवळ साडेचार हजार उत्पादने संशोधित करू शकलो आणि हेच एलएचपीच्या यशाचे मूळ कारण असल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितले. एलएचपीचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब पाटील यांनी उत्तम विक्रीपश्‍चात सेवेच्या बळावर ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अण्णासाहेबांच्या सोबत शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या गरजा व अडचणी समजावून घेतल्याने त्याचा संशोधनात खूप उपयोग झाल्याचे ठाकरे म्हणाले. शासकीय निविदांतर्गत पुरविलेले पंप गरीब शेतकर्‍यांना आणि विशेषत: अदिवासींना दिले जात असल्याने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवीत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर, कधीकधी आर्थिक झळ सोसूनही एलएचपीने या माध्यमातूनही सामाजिक कार्य केल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी नम्रपूर्वक सांगितले. आजचे जग हे स्वयंचलित यंत्रांचे. त्यामुळे मोटारशिवाय स्वयंचलित यंत्र नाही आणि यंत्राविना उद्योग नाही, हे मर्म जाणून १९८८ मध्ये ‘इंडक्शन मोटार’ उत्पादनाकडे वळलो. ध्येयावर नजर ठेवीत आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल सुरू केली.‘ड्रिव्हन बाय एक्सलन्स’ हे ब्रीद स्वीकारलेल्या एलएचपीची सर्वच उत्पादने ग्राहकांच्या मागण्यांना केंद्रबिंदू मानून दर्जा नियंत्रणाच्या कसोटीतून तावून -सुलाखून काढलेली आहेत. नवतंत्राच्या अभ्यासासाठी अनेक देशांत जाऊन अभ्यास केल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे म्हणाले की, अशा परदेश दौर्‍यात नवनवीन व्यवस्थापकीय तंत्रे, जसे की सिक्स सिग्मा, टीपीएम, फाईव्ह एस, एसक्यूसी, कानबान यांचा अभ्यास केल्यानंतर अशरश: परिस सापडल्याचा आनंद झाला. या संकल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करीत या पद्धती एलएचपीमध्ये रुजविल्या. त्यामुळे आयएसओ ९००० आयएसओ ९००१ हे मानांकन प्राप्त झाले.
या प्रगतीत कंपनीच्या सर्व लहान-मोठ्या कर्मचार्‍यांचे मोठे योगदान आहे. सान्निध्यात येणार्‍या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेण्याचे तत्त्व काळजीपूर्वकरीत्या जपले आहे. कामगारांच्या योगदानाबरोबरच सोलापुरातील नामवंत घराणे लक्ष्मी उद्योग समूहाचेे पाटील कुटुंबीय, अण्णासाहेब पाटील, डॉ. राजाभाऊ होशिंग, मोहन गांधी आदी वडीलधारी मंडळी, सोलापूर जनता सह. बँकने दिलेले अर्थसहाय्य, आर्किटेक्ट दिलीप पागे, अर्जुन घोडके, लक्ष्मीनारायण शेराल, कामगार नेते बोरोटीकर मास्तर आदी अनेक सहकार्य करणार्‍यांचा शरदजी अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. आज महिन्याला १२ हजार उत्पादने उत्पादित करण्याची क्षमता एलएचपीने गाठली आहे. पहिल्यावर्षी ७ लाखांची उलाढाल करणारी एलएचपी आज १३० कोटींवर पोहोचली आहे. ४५०० अमूल्य असे ग्राहक असलेल्या या कंपनीकडे ५००० च्यावर वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आहेत. एलएचपीचा वर्षिक विकासदर ५० टक्के असल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे यांनी २०१२ पर्यंत २५० कोटींचे उद्दिष्ट पार करून २०१५ पर्यंत ५०० कोटींपर्यंतची मजल मारू! असा विश्‍वास व्यक्त केला. एलएचपीला १९८५ साली महाराष्ट्र शासनाने लघुउद्योगातील सर्वोत्तम म्हणून गौरविले, तर १९९७ ला भारत सरकारच्या राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारानेसन्मानित केले होते. १९९५ साली आयएसओ ९०००, ९००१ हे मानांकन प्राप्त झाले. सन २००२ साली केंद्र सरकारने पुन्हा एकदा गुणवत्ता पुरस्कार एलएचपीला बहाल केला. बर्‍याच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी एलएचपीने आपली उत्पादने त्यांच्या ब्रँडनेमने बनवावीत, असा प्रस्ताव ठेवला होता, पण जागतिक दर्जावर आपले नाव कोरण्याचा ध्यास बाळगला असल्याने त्यास नकार दिला असल्याचे ठाकरे म्हणाले.ंसोलापूरच्या उद्योग विकासाचा कानमंत्र देताना शरदकृष्ण ठाकरे म्हणतात, ग्राहकांचे महत्त्व कायम ध्यानात ठेवा. अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा, कारण त्याने गुणवत्ता वाढते. जगातिकीकरणाचा फायदा घेत निर्यातीवर भर द्या. सचोटी, शिस्त, संशोधन आणि निष्ठेची कास धरा आणि पहा यश आपलेच आहे. शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितलेला हा कानमंत्र सोलापूरच्या प्रत्येक उदयोन्मुख उद्योजकाला मार्गदर्शक ठरेल याबद्दल दुमत नाही.
..............................................................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास - शरदकृष्ण ठाकरे
शरदकृष्ण ठाकरे 
व्यवस्थापकीय संचालक, लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि.
येती ५ वर्षे सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. भारतातीलच नव्हे तर, परदेशातील उद्योजक सोलापुरात येण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी येत्या ६ महिन्यांत मूलभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. ज्यामुळे सोलापुरात येऊ इच्छिणार्‍या उद्योजकांसाठी आश्‍वासक वातावरण निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन शरदकृष्ण ठाकरे यांनी केले. मोठ्या उद्योगांची वाहतूक देखील मोठीच असते, त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गाचे सहापदरीकरण ६ महिन्यांत होणे नितांत गरजेचे आहे. बंद पडलेली हवाई वाहतूकसेवा सुरू केली जावी. तसेच शताब्दी एक्स्प्रेस ही रेल्वे पुन्हा सुरू होणे महत्त्वाचे ठरते. कारण शताब्दी एक्स्प्रेस जेव्हा सुरू होती, तेव्हा मोठमोठ्या कंपन्यांचे लोक सोलापूरला येऊ लागले होते, पण शताब्दी बंद झाल्याने या लोकांचा सोलापूरला येण्याचा ओघ थांबला आहे आणि हे सोलापूरच्या विकासाला खीळ बसणारे असल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे. पायाभूत सुविधा हा औद्योगिक प्रगतीचा प्राण आहे! शहरात मूलभूत सोयी-सुविधां जसे की, शुद्ध पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, शिस्तबद्ध वाहतूक आदींची पूर्तता झाली तर, मॅनेजमेंट किंवा प्रथम दर्जाचा अधिकारीवर्ग ज्याला आपण ‘स्किल्ड मॅन पॉवर’ म्हणतो, तो वर्ग येणे सुरू होईल. त्यामुळे स्किल्ड मॅन पॉवरचा प्रश्‍न सुटेल, शिवाय यामुळे सोलापूरच्या उत्पादनांचा दर्जा व क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सोलापूरच्या मूलभूत सोयी-सुविधांची वानवा असल्याने आज हा वर्ग येथे येण्यास उत्सुक नाही. राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूरकर विकासापासून वर्षानुवर्षे वंचित राहिले आहेत. अनेक वर्षांपासून जकातीचा प्रश्‍न सतावत आहे. घेतलेल्या जकातीचा ९० टक्के परतावा देखील महापालिकेकडून मिळत नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात स्पर्धात्मक किमती ठेवण्यात जकातीचा मोठा अडसर असल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे म्हणाले की, ‘जकात रद्द केली जावी म्हणून मी अनेक प्रयत्न केले आहेत. शासन, लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली, तरीही जकात हटलेली नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून एलएचपीचा प्रकल्प १४ डिसेंबर २००५ रोजी चिंचोळी एमआयडीसी येथे हलविणे भाग पडले, पण हे सर्वच उद्योजकांना करणे शक्य नाही, त्यामुळे सोलापूरच्या उद्योगवाढीला जकातीमुळे खीळ बसत असल्याने शासनकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा. सोलापूरचा कामगारवर्ग हा अतिशय पापभीरू असून, कार्यक्षम, संयमी आहे, पण सोलापूरच्या कामगारांबद्दल सतत चुकीचा प्रचार केला गेला आहे. वस्तुत: मालक किंवा व्यवस्थापनाच्या चुकांचे खापर कामगारवर्गावर फोडले गेले. सोलापुरात जर दर्जेदार वाहतूक व्यवस्था, रुंद रस्ते, स्वच्छ, मुबलक व किफायतशीर दरात पाणी आणि वीज पुरवली, तर सोलापूर हे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून बिरूद मिरवेल, यात शंकाच नाही!.
...............................................................................................
उद्योगातील नवी पिढी : आदित्य शरदकृष्ण ठाकरे
आदित्य शरदकृष्ण ठाकरे
‘जगतिक दर्जाच्या दृष्टीने फॅक्टरी ऍटोमेशन करणे अपरिहार्य आहे’, हे मत आहे शरदकृष्ण ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य शरदकृष्ण ठाकरे यांचे. आदित्य शरदकृष्ण ठाकरे हे उद्योगक्षेत्रात उतरलेले असून, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून एलएचपीच्या विकासाला वेग देण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी ‘गिअरबेस्ड् मोटार्स, पीएमबीसी मोटार्सचे उत्पादन सुरू केलेले आहे. नव्या पिढीतील उद्योजक आदित्य म्हणतात की, माहिती -तंत्रज्ञानाच्या काळात दर्जेदार उत्पादनांबरोबरच व्यावसायिकताही महत्त्वाची आहे. उत्पादनक्षमता सुधारणे आणि पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. उत्पादनाचा दर्जा व क्षमता वाढविण्यासाठी नवनव्या सॉफ्टवेअर्सचा वापर ही काळाची गरज आहे. एलएचपीमध्ये ‘सॅप’ प्रोग्रामिंगचा वापर सुरू केल्याचे सांगून आदित्य म्हणाले की, यामुळे प्रॉडक्टीव्हिटी व दर्जा सुधारला व रिजेक्शन प्रमाण ०.४ टक्क्यांपेक्षाही कमी झाले.
....................................................................................................................................
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी. रविवार, दि. २६ सप्टेंबर २०१०

0 comments:

Post a Comment