हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेम

हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेम
देशाच्या अबू्रचे धिंडवडे काढणारा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धातील भ्रष्टाचार
•अमर पुराणिक
कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु व्हायला केवळ ६० दिवस राहिले असताना यातील प्रचंड मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. कोण म्हणतेय, कॉमनवल्थ गेम्स म्हणजे, हा पैशाचा अपव्यय आहे, तर कोण म्हणतो की नेते व सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांना अतिरिक्त कमाईसाठीच या खेळांचे आयोजन केले गेले आहे. सेंट्रल व्हिजिलंस कमीशनने केलेल्या तपासात असे आढळुन आले आहे की, या खेळाच्या आयोजकांनी आपले खिसे भरण्यासाठी या खेळांच्या नियोजनांतर्गत अनेक सोयी करुन घेतल्या आहेत.  काही लोक म्हणतात की, ज्या देशातील कोट्‌यवधी लोक आजही दारिद्र्य रेषेखाली रहातात त्या देशात असा पाण्यासारखा पैसा खर्च करुन इतक्या मोठ्‌या स्पर्धांचे आयोजन करण्यात कोणतेही औचित्य नाही. एकंदर कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे गरिब भारतीय नागरिकांची ‘हेल्थ’ बिघडवून नेतेमंडळी स्वत:ची ‘वेल्थ’ वाढवत आहेत, असेच म्हणावे लागेल.
आपले खेळाडू भलेही आपली प्रतिभा दाखवतील किंवा दाखवणार नाहीत पण, समस्त नेतेमंडळी, कंत्राटदार, इंजिनीअर्स, अधिकारी यांनी आपली असामान्य(?) प्रतिभा दाखवला सुरुवात केली आहे.  प्राथमिक चौकशीत असे अढळून आले आहे की, यात हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे. या स्पर्धेच्या नावाखाली कर देणार्‍या सामान्य जनतेच्या पैशाची अक्षरश: लूट सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यात केवळ सुरेश कलमाडी दोषी नसून भारत सरकार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रधानमंत्री मनमोहन सिंह हे जास्त जबाबदार आहेत. कारण जगासमोर आपले नाक कापले जाऊ नये म्हणून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडी झाल्यानंतर सरकारी तिजोर्‍या उघड्‌या केल्या आहेत. पण वास्तविक यांना देशाच्या नाकापेक्षा स्वत:च्या नाकाची व सत्तेची काळजी आहे. स्पर्धेच्या निर्धारित आकडेवारीपेक्षा अनेक पटीने अधिकबजेट यावर खर्च झाले आहे आणि होणार आहे. शेवटी या खेळात कोट्‌यवधी रुपयांची मातेरे होणार आहे हे निश्‍चित.कदाचित सरकार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना बळीचा बकरा करुन आम्ही सगळे स्वच्छ आहोत असे निर्लजपणे सांगत पुन्हा नव्या भानगडी करायला मोकळे होतील.
३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा आयोजन समितीचे कोषाध्यक्ष अनिल खन्ना यांचा चिरंजीव आदित्य खन्ना कार्यरत असलेल्या रीबाऊंड ऐस या कंपनीला आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये १४ सिंथेटिक कोर्ट तयार करण्याचे कंत्राट मिळाले होते. आपल्या पदाचा गैरवापर करून खन्ना यांनी रीबाऊंड ऐस कंपनीला हे कंत्राट मिळवून दिल्याच्या आरोपानंतर अनिल खन्ना यांनी राजीनामा दिला आहे. रीबाऊड ऐस ही ऑस्ट्रेलियन कंपनी असून, आदित्य हा या कंपनीच्या भारतातील शाखेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यात खन्ना हे अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सचिव देखील आहेत, हे  येथे उल्लेखनीय आहे.
लंडनच्या एएम कंपनीसोबत केलेल्या संशयास्पद कराराप्रकरणी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या चौकशी समितीने राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे संयुक्त संचालक टी. एस. दरबारी आणि उपमहासंचालक संजय महिंद्रू यांची हकालपट्टी केली आहे. क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडन येथील कार्यक्रमासाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्याच्या नावाखाली लाखो पाऊंडस देण्यात आल्यासंदर्भात भारताच्या ब्रिटनमधील उच्चायोगाचा ई-मेल एका पत्रकारपरिषदेत दाखवण्यात आला होता. ब्रिटनमधील एका कंपनीला देण्यात आलेल्या रकमेबद्दलचा खोटेपणा एका वृत्तवाहिनीने उघड केला होता.  ई-मेल फेरफार केलेला असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केल्यापासूनच भ्रष्टाचार करणार्‍यांची गोची झाली आहे. ‘या योजनांवर प्रत्यक्ष झालेला खर्च ११ हजार ५०० कोटी इतका असून ५० हजार किंवा १ लाख कोटींचा जो आकडा विरोधी पक्षांकडून सांगितला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे’, अशी सारवासारव शहरी विकासमंत्री एस. जयपाल रेड्डी  करतात. घोटाळ्यासंदर्भात विरोधी पक्ष आकडे फुगवून सांगत असल्याचे सरकारही म्हणत असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची तयारी दर्शविली आहे. सीबीआयला तोंड देण्याचे सरकारचे किती धारिष्ट आहे पहा. सीबीआय ही कॉंग्रेस सरकारच्या दावणीला बाधलेली आहे, हे आता सर्वांनाच माहित आहे. भाजपाने वारंवार तसा आरोप केलेलाही आहे. सोनिया गांधी कॉंग्रेसच्या व स्वत:च्या फायद्‌‌‌यासाठी सतत सीबीआयचा गैरवापर करत असताना राष्ट्रकूलाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय काय दिवे लावणार हे स्पष्टच आहे. या प्रकरणातील सर्व भ्रष्ट मंडळी ‘बा इज्जत बरी’ होतीलच इतका आत्मविश्‍वास सोनियांना आहे, म्हणूनच कोणत्याची प्रकरणात कॉंग्रेसनेते सीबीआय चौकशीला तयार होतात.
ही सर्व प्रकरणे उघड झाली आहेत तो फक्त नमुना आहे. यापेक्षा आणखी अनेक प्रचंड मोठे गैरव्यवहार यात झालेले असावेत. ही भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होतील किंवा होणारही नाहीत. या विषयावर सोनिया गांधी, पंतप्रधान, क्रीडा मंत्रालयसारेच गप्प का आहेत? यांचे हात यात गुंंतलेले तर नसावेत.अनेक सत्ताधारी नेते ‘कॉमन वेल्थ’ सारख्या देशातील सर्वच उपक्रमांच्यामाध्यमातून वैयक्तिक संपत्ती जमविण्यात गुंतले आहेत हेच सिद्ध होते. इतका प्रचंड पैसा खर्च करुन पुन्हा सत्तेवर आले, हा पैसा परत मिळवण्यासाठी भ्रष्टाचाराची अशी अनेक प्रकरणे होत आहेत, होत रहातील.  जनतेच्या खिशा हात घालून ओरबडून पैसा घेणारी ही कॉंग्रेस आणि त्याची पिल्लावळी अशा प्रकाराला सोकावली आहेत. स्वत: डोळ्यातील मुसळ काढायचे सोडून विरोधकांच्या डोळ्यातील कूसळ दाखवण्याचा हा प्रकार सतत होत आहे.
वास्तविक राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन हे जगासमोर भारताला चांगल्या पद्धतीने सादर करण्याची एक नामी संधी आहे. जगाने भारताकडे आदराने पाहावे यादृष्टीने राष्ट्रकुलच्या यशस्वी आयोजनाने मोठी भूमिका बजावता आली असती. पण भारतासारख्या विकसनशिल देशाला इतक्या महागड्‌या स्पर्धा भरवणे परवडणारे नाही. सर्वसामान्य नागरिक गरीबी आणि महागाईने होरपळत असताना ते भारतीय म्हणून गर्व अनुभवत नाहीत. जर भारताने राष्ट्रकूल स्पर्धेचे यजमानपद स्चिकारले नसते तर भारताचे कोणतेही नुकसान झाले नसते. या स्पर्धातून भारताताची जगभरात आब्रनुकसानी होण्यापलिकडे उपलब्धी काहीही नसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणतो की अशा खर्चीक  स्पर्धांची गरजच काय?
राष्ट्रकुल स्पर्धेच्याआयोजनावर ३५ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. इतका पैसा खर्च करण्याची मुळातच गरज काय? इतक्या रकमेत एक वर्षाची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना चालवली जाऊ शकते.  कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्‌घाटन समारंभावर १०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या स्पर्धेच्या दरम्यान दिल्लीत एक मोठा फुगा उडवण्यावर ४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या फुग्यात भरला जाणारा गॅस देखिल परदेशातून इंपोर्ट केला जात आहे. सध्या स्पर्धांचे बजेट वाढलेलेच आहे शिवाय भ्रष्टाचारामुळे ते आणखी फुगले आहे. स्पर्धेला जवळपास दोन महिने बाकी आहेत. याकाळात ते आणखीनच वाढणार आहे.
प्रत्येकाला आपापली मते असतात आणि प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा हक्क आहे. काहीजण म्हणतात की, जर कॉमनवेल्थ गेम्स यशस्वी ठरल्या तर जगातिक स्थरावर भारतीय ब्रँड विकसित होईल. भारताचे जगभर उत्तम मार्केटींग होईल, त्यामुळे या स्पर्धेवर केला जाणार खर्च व्यर्थ जाणार नाही. अशा प्रकारे केलेल्या खर्चाचे फायदे तत्काळ लक्षात येत नाहीत. ही विचारवंत मंडळी याचे उत्तम उदाहरण म्हणून चीन, सिडनी ऑलंपिक चे उदाहरण सांगतात. नंतर चीनला याचा अप्रत्यक्ष फायदा खूप झाला. चीनमध्ये या स्पर्धानंतर गंतवणूकदारांची रांग लागली आणि चीन आता आथिर्र्क महासत्ता झाला असल्याचे ही विद्वान मंडळी सांगतात. ऑस्ट्रेलियाचाही स्पर्धामुळे असाच फायदा झाल्याचे सांगतात.
या विचारवंतांच्या मताप्रमाणे चीन व ऑस्ट्रेलियाची प्रगती फक्त या खेळाच्या आयोजनामुळेच झाली असे म्हणायचे काय? त्यांच्या श्रमाचे व इतर प्रयत्नाचे त्यांच्या प्रगतीत काहीही योगदान नाही. याउपर काहीजण म्हणतात की, योग्यपद्धतीने खर्च केला तर फायदा होतो. पण भारतात कोणत्याही उपक्रमाचे आयोजन भ्रष्टाचाराविना आणि शिस्तबद्धरितीने झालेले वानगी दाखल देखिल सापडत नाही. भारतीय नेते, अधिकारी मंडळी अशा कार्यक्रमांकडे देशहितापेक्षा फक्कड अर्थार्जनाची संधी आणि भ्रष्टाचाराचे कूरण मानतात, मीत्रांनो हे आपण विसरलात की काय? आता ज्या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ लागल्या आहेत, त्या पाहिल्यावर राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीवर कमी आणि आपले खिसे भरण्यावर आपल्या भारतीय नेते मंडळी व अधिकार्‍यांनी लक्ष केंंद्रीत करत असतात आणि या आधीदेखील हेच झालेले आहे, ही वस्तूस्थिती तथाकथीत विद्वान मंडळी सोयिस्कररित्या विसरतात की काय?
आता इतके सगळे घडल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यालयाची प्रतिक्रिया अशी आहे की, या स्पर्धा दिल्ली, भारतात होणार नसून कोठेतरी अन्य ठिकाणी होणार आहेत. प्रसारमाध्यमांनी यावर राळ  उठवली आहे, पण कॉंग्रेस श्रेष्ठी व पंतप्रधान कार्यालय झोपेचे सोंग घेत आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे प्रमुख मायकल फेनेल यांनी तयारीला  उशिर होत असल्याने चिंतीत होऊ आयोजन समितिला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.

दै. तरुण भारत, सोलापूर.

0 comments:

Post a Comment