दहशतवाद आणि शार्ली एब्दो

•चौफेर : अमर पुराणिक•

इस्लामिक दहशतवाद हळूहळू जगभर पसरतोय. सगळेच देश सावकाश सावकाश मुस्लिमबहूल होत आहेत. त्यामुळे या अतिरेक्यांचा वावर सर्वत्र वाढत चालला आहे. पॅरिस हल्ल्याच्या हल्लेखोरांना शिक्षा होईल तेव्हा होईल पण इस्लामिक धर्माच्या आवरणात लपेटलेला आतंकवाद कसा संपवणार हा खरा प्रश्‍न आहे. याचे उत्तर जेव्हा मिळेत तेव्हाच खर्‍या अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकळा श्‍वास घेईल.

जगभरात फ्रांस आणि त्यांची राजधानी पॅरिस लोकशाही मुल्यं, कला, संस्कृती आणि बुद्धीमानांचा सन्मान करणारी म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र, समता आणि बंधुत्वाचा नारा येथूनच प्रथम दिल्याचे म्हटले जाते. इतिहासकाळात चर्चच्या आडून सत्ता काबिज करुन जनतेवर अत्याचार केले गेले  तेव्हा येथिल बुद्धीजीवींनी आपली लेखणी उपसली आणि तिखट वैचारिक टीका करुन जनतेला क्रांतीसाठी प्रेरित केले. या त्या काळातील घटना आहेत ज्या काळात बहुतांश देशात राजेशाही किंवा हुकुमशाही चालत होती. गुलामी, सरंजामशाहीच्या माध्यमातून मानवाशी पाशवी व्यवहार केले जात होते. त्यावेळी औद्योगिक विकास नव्हता, संचार साधने नव्हती, तलवारी घेऊन आमने-सामनेची लढाई लढली जात होती. तेव्हा व्यक्ती आपली क्षुद्रता मागे सोडून विकसित होऊ पाहात होता. त्यातूनच पुढे लोकशाहीची मुल्ये रुजु लागली, मानवतेची व्याख्या पुनर्भाषित होऊ लागली, व्यक्तीस्वतंत्र्याचा पाठपुरवा होऊ लागला. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करत दुसर्‍याचा सन्मान करावा असे अलिखीत नियम बनत गेले.
गेल्या आठवड्‌यात शांत आणि सुंदर अशा पॅरिस शहरात एका साप्ताहिकाच्या कार्यालयावर दिवसा ढवळ्या गोळीबार झाला.कट्टरपंथी इस्लामी अतिरेक्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी पॅरिस येथील शार्ली एब्दोच्या कार्यालयावर गोळीबार करून साप्ताहिकाच्या ४ व्यंग्यचित्रकारांसह १२ लोकांना ठार मारले होते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही आणि सभ्यतेवर हल्ला झाल्याची जगभरातुन टीका झाली. पण याचा भारतात म्हणावा तितका तीव्र निषेध होताना दिसला नाही. शार्ली एब्दो हे एक फ्रेंच व्यंगचित्र साप्ताहिक आहे. यात व्यंगचित्रांना विशेष स्थान दिले जाते. यात विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून असामाजिक घटनांवर प्रकाश टाकला जातो. १९६९ मध्ये हे व्यंगचित्र साप्ताहिक हाराकिरी नावाने प्रसिद्ध होत होते. पण १९८१ साली ते बंद पडले. १९९२ साली याचे पुनरुज्जीवन केले गेले.
२००७ मध्ये या व्यंगचित्र साप्ताहिकात मुस्लिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापल्यानंतर हे साप्ताहिक वादाचे केंद्र बनले. मुस्लिम जगतातून याला खूप विरोध झाला. या साप्ताहिकाला कायदेशीर कारवाईतून जावे लागले. २०११ मध्ये या व्यंगचित्र साप्ताहिकाची विशेष पुरवणी काढण्याची घोषणा केली आणि या पुरवणीचे एडिटर इन चिफ मोहम्मद पैगंबर यांना बनवले. तेव्हा नोव्हेंबर २०११ मध्ये या साप्ताहिकाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला आणि या साप्ताहिकाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाची जागा बदलण्यात आली. मोहम्मद पैगंबर यांची व्यंगचित्रे छापून इस्लामी कट्टरतेची व्यंगचित्रांच्या माध्यमातून टर उडवल्यामुळे शार्ली एब्दो हे साप्ताहिक इस्लामी दहशतवाद्यांच्या कायम निशान्यावर राहिले. पण गेल्या बुधवारी ज्याप्रकारे ३ बंदूकधारी दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला त्यात संपादक, व्यंगचित्रकार ठार झाले हे पाहून संपुर्ण विश्‍व थरारले. इराक, सीरिया, लीबिया, पाकिस्तान, अफगाणीस्तान सारख्या मुस्लिम देशात असे गोळीबार, हल्ले होणे सामान्य आहे. माध्यमेही अशा घटनांच्या बातम्या दैनंदिन बातम्यासारखेच देत असतात. पण युरोप, अमेरिकेसारख्या देशात जेव्हा अतिरेकी हल्ले होतात तेव्हा विकसित देश मोठ्‌या चिंतेत पडतात.
फ्रांन्ससारख्या देशात जेव्हा असा हल्ला होतो तेव्हा चिंतेची बाब ठरते. मुळात अतिरेकी हल्ला कोठेही, कोणावरही झाला तरी त्यांचा निषेध झाला पाहिजे. पत्रकार, कलावंतावर हल्ला होणे निंदनियच आहे. एखाद्या पत्रकार, माध्यमातून किंवा कलावंताकडून अयोग्य टीका झाली तर त्यासाठी कायदेशीर मार्ग मोकळा असताना हिंसक हल्ले होणे अनुचित आहे. येथे प्रश्‍न भारताचा आहे. भारतात मात्र या हल्ल्याची निर्भत्सना होताना दिसली नाही. याला आश्‍चर्य म्हणावे काय? कारण भारतात जर अशी घटना घडली असती तर आणि हल्लेखोर गैरमुस्लिम असते तर मात्र माध्यमं, सेक्यूलर, तथाकथित विचारवंत, डावे तुटून पडले असते. त्यामुळे भारतातून या घटनेचा म्हणावा तसा निषेध झाला नाही यात कोणतेही आश्‍चर्य नाही. भारतात हल्लेखोर किंवा आंदोलक कोणत्या धर्माचा आहे ते पाहून माध्यमे, सेक्यूलर विचारवंत टीका करत असतात. याचे उदाहरण एम. एफ. हुसेन हे आहेत. हुसेन यांनी हिंदू देवतांची नग्न चित्रे काढली. त्यावर कायदेशीर कारवाईचा विचार झाला तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला ठरवला गेला. हुसेन यांनी उलट देश सोडून जाण्याची धमकी दिली. अशी अनेक उदारणे आहेत. हल्लेखोरांना सेक्यूलर असल्याची फूटपट्टी लावून ठरवले जाते की किती टीका करायची. शांततेत चाललेली आंदोलनेही जर सेक्यूलरांची नसली हिंदूंची असली तर मात्र हे सेक्यूलर लोक खवळून उठतात. अभिव्यक्ती स्वातंत्र, मानवअधिकार अशी ठेवणीतील उखाणी म्हणत आंदोलकांना आणि आंदोलनाला झोडपून काढले जाते. त्यात ही माध्यमे, सेक्यूलर विचारवंत आघाडीवर असतात. विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना आदी संघटना जेव्हा हक्काच्या मागणीसाठी आंदोलने करतात तेव्हा आपण अनेकदा असे दृष्य पाहिले आहे. प्रसार माध्यमे संविधानप्रदत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर करत विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेनेच्या आंदोलकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जोरदार प्रहार करतात. केवळ बातम्या न देता वाह्यात टिप्पणी करत असतात, अशा टिप्पण्यांना दूरचित्रवाहिनीवरुन भरपूर कव्हरेज दिले जाते. यावर अतर्किक आणि संदर्भहीन चर्चा घडवल्यात जातात. यात देशाचे व्यापक हित नव्हे तर सेक्यूलरांचा व्यापक स्वार्थ लपलेला असतो.
फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात धार्मिक तणाव वाढले आहेत. फे्रेंच लेखक मिशेल वेलबेक यांच्या एका पुस्तकावरुन असाच वाद झाला. या पुस्तकात आजच्या फ्रान्स मधील राष्ट्रीय आणि सामाजिक स्थितीवर वास्तववादी भाष्य केले आहे. आज फ्रान्समधील वाढत्या इस्लामिक प्रभावाचा आणि परिस्थितीचा विचार करुन लेखकाने भविष्यात काय होऊ शकते यावर फ्र्रेंच नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. त्यात म्हटले आहे की, २०२२ पर्यंत फ्रांन्सचे इस्लामीकरण झालेले असेल. तेथे मुस्लिम राष्ट्रपती होईल, महिलांना बुरखा घालणे सक्तीचे झालेले असेल. अशा लिखाणामुळे या पुस्तकावर इस्लाम विरोधात लोकांना भडकावण्यासाठी उद्युक्त केल्याचा आरोप झाला आहे. लेखकाचा दावा आहे की, या पुस्तकाचे कथानक मानव सभ्यताकेंद्रित धर्म स्थापनेवर आधारित आहे. मिशेल वेलबेक यांचे पुस्तक आणि शार्ली आब्दोवर आतंकी आक्रमण साधारणपणे एकाच वेळी होणे योगायोग असला तरीही यांच्या मुळाशी इस्लामिक कट्टरताच आहे. तिकडे जर्मनीत पेगिडा (पेट्रिओटिक यूरोपियन्स अगेंस्ट दि इस्लामिझेशन ऑफ दि वेस्ट) नामक आंदोलन चालू आहे. त्याचा मुस्लिमांकडून खूप विरोध होत आहे. आणि तेथील काही मुठभर तथाकथिक सेक्यूलरही या आंदोलनाचा विरोध करत आहेत. या सेक्यूलरांना इस्लाम बळजबरीने जगभर पसरला तर चालतो पण मानवतावाद चालत नाही.
इस्लामिक दहशतवाद हळूहळू जगभर पसरतोय. सगळेच देश सावकाश सावकाश मुस्लिमबहूल होत आहेत. त्यामुळे या अतिरेक्यांचा वावर सर्वत्र वाढत चालला आहे. पॅरिस हल्ल्याच्या हल्लेखोरांना शिक्षा होईल तेव्हा होईल पण इस्लामिक धर्माच्या आवरणात लपेटलेला आतंकवाद कसा संपवणार हा खरा प्रश्‍न आहे. याचे उत्तर जेव्हा मिळेत तेव्हाच खर्‍या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण होईल.

0 comments:

Post a Comment