मोदींची लाहोर भेट आणि कॉंग्रेसची द्वेषमुलक नीती

•चौफेर : अमर पुराणिक•
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आकस्मिक पाकिस्तान भेटीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत केले गेले. पण कॉंग्रेसला मात्र नरेंद्र मोदी यांची पाकिस्तान भेट पचनी पडली नाही. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी अतिशय त्वेषाने विचारत होते की, मोदींनी देशाला सांगावे की नवाज शरीफ यांच्याशी काय बोलणी झाली. हे दुरचित्रवाणीवर पहात असताना ते राजकीय नेते न वाटता वाहिनीवरील सूत्रधार असल्याच्या थाटात त्वेषाने बोलत होते. प्रत्येक वाक्यागणिक ‘देश जानना चाहता है’ ची आवर्तनं सुरु होती. अशी विधान करुन कॉंग्रेसनेते आपली राजकीय अपरिपक्वता आणि द्वेषमुलक नीती प्रकट करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच रशिया, अफगाणिस्तानचा दौरा केला. दरम्यान त्यांनी पाकिस्तानलाही धावती भेट दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या विवाह सोहळ्यालाही हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आकस्मिक पाकिस्तान भेटीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत केले गेले. पण कॉंग्रेसला मात्र नरेंद्र मोदी यांची पाकिस्तान भेट पचनी पडली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी-शरीफ भेटीचे स्वागत होत असताना कॉंग्रेसने मात्र टीका केली. अर्थात पंतप्रधान मोदी जे काही करतील ते चूकीचेच आहे, हे सांगण्याची कॉंग्रेस एकही संधी सोडत नाही. भारत-पाकिस्तान संबंधाबाबत इतके दिवस सरकारच्या भूमिकेवर कॉंग्रेस सतत टीका करत होते. आता मोदींनी पाकिस्तानला भेट दिली त्याचे स्वागत न करता कॉंग्रेसने आताही कॉंग्रेस नेत्यांनी छद्मी टीका केली. हे समजण्यापलिकडचे आहे की कॉंग्रेसला भाजपा सरकारच्या प्रत्येक कृतीवर आपत्ती का आहे.
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी अतिशय त्वेषाने विचारत होते की, मोदींनी देशाला सांगावे की नवाज शरीफ यांच्याशी काय बोलणी झाली. हे दुरचित्रवाणीवर पहात असताना ते राजकीय नेते न वाटता वाहिनीवरील सूत्रधार असल्याच्या थाटात त्वेषाने बोलत होते. प्रत्येक वाक्यागणिक ‘देश जानना चाहता है’ ची आवर्तनं सुरु होती. अशी विधान करुन कॉंग्रेसनेते आपली राजकीय अपरिपक्वता आणि द्वेषमुलक नीती प्रकट करत आहे. काही महिन्यांपुर्वी कॉंग्रेस नेते पाकिस्तानात जाऊन तेथील दूरचित्रवाहिनीच्या मुलाखतीत पाकिस्तानशी जर चांगले संबध हवे असतील तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरुन हटवावे अशी देशद्रोही भूमिका घेत पाकिस्तानकडे याचना केली होती. तेव्हा सोनिया गांधी आणि त्यांच्या कॉंग्रेस नेत्यांनी सत्तेच्या मोहापायी आपण किती हीन पातळीवर जातोय याचे भानही ठेवले नाही.
राजकारण बाजुला ठेऊन हे पाहणे आवश्यक आहे की, मोदी यांचा लाहोर दौरा कसा झाला अथवा त्या दौर्‍याचे आकलन आणि विश्‍लेषण कोणत्या पद्धतीने करता येऊ शकते याचा सारासार विचार न माध्यमातून होताना दिसतो ना राजकीय पक्षांकडून होताना दिसतो. दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांनी सांगितले की हा पाकिस्तान दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबुल येथून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या दूरध्वनीवरील संभाषणाच्या पार्श्‍वभूमीवरुन झाला. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी माध्यमांना सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: भेटीसाठी पुढाकार घेतला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काबुलवरुन दिल्लीला परतताना मोदी यांनी लाहोर येथे भेटण्यासाठी स्वत: आमंत्रण दिले. येथे या बाबीला महत्त्व देणे महत्त्वाचे आहे की दोन्ही देशांदरम्यान सद्भावना विकसित झाली आहे. पाकिस्तानातील मोठा वर्ग नरेंद्र मोदी यांच्याबाबत संदिग्ध भूमिकेत आहे. हा वर्ग मोदी हे पाकिस्तानला पसंद करत नाहीत असे मानतो.
पण वस्तूस्थिती वेगळी आहे. मोदी राजकीय संबंध, नागरी संबंध आणि दहशतवाद यातील स्पष्ट फरक जाणून आहेत. दहशतवादाचा निषेध केला याचा अर्थ मोदी हे नागरी संबंधांचाही निषेध करतात असा होत नाही. भारतातील काही माध्यमे आणि कॉंग्रेस तशी मोदींची प्रतिमा निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत त्यामुळे पाकिस्तानी जनतेला मोदींबाबत तशी सांशकता वाटते. पण मोदी यांनी या दौर्‍यात पाकिस्तानी नेतृत्व आणि तेथील जनतेला अश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून भारत-पाकिस्तान संबंधात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने मोदी सरकार गंभीरपणे प्रयत्न करत असल्याचे हे द्योतक आहे. खरे तर पंतप्रधान मोदी यांनी हे तेव्हाच दाखवून दिले आहे जेव्हा ते सत्तेवर आले. मे २०१४ मध्ये आपल्या शपथविधी सोहळ्याला सार्क देशांच्या सर्व प्रमुखांना, नेत्यांना आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही दिल्लीत आमंत्रित केले होते. सध्यातर पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र संबंधाबाबत यांनी खूप लांबचा पल्ला गाठलेला आहे. पण विरोधकांनी सतत उलट प्रचार आणि टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दहशतवादाच्या विरोधाचा, सीमेवरील तणावाचा, गोळीबाराच्या विरोधाचा कॉंग्रेसने विपर्यास्त केला व दहशतवादाला विरोध म्हणजे पाकिस्तानच्या नागरी संबंधांनाही विरोध असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला आहे. मोदी यांनी अनेकदा सांगितले आहे की, पाकिस्तानशी संबंधांबाबतीत ते आजपर्यंतचा इतिहास बदलू इच्छितात. आंतकवाद संपवून शांतीपुर्ण संबंध निर्माण करण्याची त्यांनी अनेकदा वाच्यता केली आहे.
भारतातील काही मणीशंकर अय्यर, सलमान खूर्शिद सारखे कॉंग्रेस नेते जी काही वाह्यात विधानं करतात त्यावर विसंबून पाकिस्तानी राजनीतिक वर्ग भारत- पाकिस्तान संबंध सुधारतील का? अशी सांशक भूमिका मांडतो. यासाठी थोडे खोलात जाणे आवश्यक आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी लवचिकता दाखवत दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना बँकॉक येथे भेटण्याची अनुमती दिली. यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तात्काळ अफगाणिस्तानवर झालेल्या संमेलनात भाग घेण्यासाठी इस्लामाबादला गेल्या. नव्या वार्ताप्रक्रियेत सर्व विषयांचा समावेश केला त्याचे तीन विभागात वर्गीकरण केले गेेले. प्रथम चरणात व्यापार आणि इतर कार्यक्रमात सहयोग वाढवणे. दुसर्‍या चरणात मानवी मुद्दे म्हणजे भारतीय मासेमारांची सुटका करणे आणि तिसर्‍या चरणात काश्मिर आणि सियाचिन समस्येवर उपाययोजना करणे.
पण पाकिस्तानी सेना भारताच्या संबंधाबाबत राजकारण्यांसारखा विचार करत नाही. उदारणार्थ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ भारतासोबत व्यापारी संबंध संपुर्णपणे मुक्त करु इच्छितात पण पाकिस्तानी सेना त्यांना परवानगी देत नाही. याशिवाय इतरही अनेक बाबतीत शरीफ यांच्यापेक्षा वेगळी भूमिका पाकिस्तानी सेना घेते. जर मोदी यांच्या या पाकिस्तान दौर्‍यावरुन पाकिस्तानी सेनेने सकारात्मक दिशेने पाऊल टाकले तर मोदी यांचा हा लाहोर दौरा मोठे यश देऊन जाईल. पण पाकिस्तानी सेना कधीही पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वासोबत सहकार्य करत नाही ही वस्तूस्थिती आहे आणि शरीफ यांच्याबाबतही पाक सेना अशीच भूमिका घेईल. पण जर पाक सेना आपली भूमिका बदलून शरीफ यांना सहकार्य करणार असेल, पाकव्याप काश्मीर वरचा हक्क सोडणार असेल तर मात्र असे म्हणावे लागेल की पाक सेना भारताविरुद्ध आतंकवादाला खतपाणी घालण्याची आपली नीती सोडण्यास तयार आहे. मोदी यांच्या लाहोर दौर्‍यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे त्याची खरी परिक्षा येत्या महिन्याभरात होणार्‍या दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या चर्चेच्या वेळी होणार आहे. मोदी यांनी साहसी पुढाकार घेतला आहे पण पाकिस्तानी सेना काय भूमिका घेते यावर सर्वकाही निर्भर आहे.
एकंदर मोदी यांचा हा पुढाकार एक शुभ लक्षण आहे. याशिवाय या भेटीचे अनेक सुखद संयोग आहेत. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुशासन दिन साजरा करण्याचा मानस आहे. याच दिवशी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस होता. याच दिवशी मदन मोहन मालविय यांचीही जयंंती आहे. हा संयोग कमी होता म्हणून की काय याच दिवशी नवाज शरीफ यांचाही वाढदिवस होता. अनेक शुभ संयोग या दिवशी जुळून आले आहेत आणि या पुढाकाराचा शुभ परिणाम ही साधला जाईल अशी आशा आहे.

0 comments:

Post a Comment