जगभरातील हिंदूंचे रक्षण, हे भारत सरकारचे कर्तव्य

डॉ. मोहनजी भागवत
दर वर्षीप्रमाणे यंदाही नागपूरच्या रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा झाला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या वेळी आपल्या भाषणात विजयादशमीच्या पर्वाचे आजच्या काळातील महत्त्व प्रतिपादित केले. तसेच देशातील विविध समस्यांचा परामर्श घेत त्यांनी हिंदू जनतेला जागृतीचे आवाहनही केले. या कार्यक्रमाला आर्ष विद्या गुरुकुलम संस्थेचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मोहनजी यांच्या भाषणाचा अनुवादित सारांश.
 
आजच्या दिवशी आपल्याला स्व. सुदर्शनजी यांच्यासारख्या मार्गदर्शकाची आठवण होते. विजययात्रेत आपल्याला अर्ध्यावर सोडून गेलेल्या वीरांचे स्मरण पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देत असते.
विजयादशमी हे विजयाचे पर्व आहे. दानवतेवर मानवतेच्या, दुष्टतेवर सज्जनतेच्या विजयाच्या रूपात देशभरात ते साजरे केले जाते. विजयाचा संकल्प करून आपल्याच मनात आपल्या दुर्बळ कल्पनांनी आखून घेतलेल्या क्षमतेची आणि पुरुषार्थाची सीमा ओलांडून पराक्रम करण्यासाठी आजचा दिवस उपयुक्त समजला जातो. देशाच्या जनमानसाला याच सीमोल्लंघनाची आवश्यकता आहे. कारण देशात आज द्विधा आणि गोंधळाची परिस्थिती आहे. यातून देशाला बाहेर काढण्यासाठी लोकशक्तीच्या बहुमुखी, सामूहिक उद्यमाची गरज आहे. आपल्यात तशी क्षमता आहे, हे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या 65 वर्षांच्या काळात आपण अनेकदा सिध्द केलेले आहे. विज्ञान, व्यापार, कला, क्रीडा इ. सर्व क्षेत्रात भारताने आपली गुणवत्ता सिध्द केल्याची वर्तमानातील बरीच उदाहरणे सहज देता येतात. सध्या देशातील जनमानस भविष्याविषयी चिंतित आणि कुठेकुठे निराशही दिसून येते. देशातील आंतरिक व सीमेवरील सुरक्षा याबाबतची परिस्थिती फारशी आशादायक नाही. आपल्या सैन्यदलांना देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे आणि साधने यांचा पुरवठा, सीमेवरील त्यांच्या ठाण्यांवर साधने व अन्य रसद पोहोचविण्यासाठी आवश्यक रस्ते, वाहने व दळणवळणाच्या सोयी यात असणाऱ्या कमतरता तत्परतेने दूर केल्या पाहिजेत. सुरक्षेशी संबंधित सर्व साधनांच्या उत्पादनात आपला देश स्वावलंबी व्हावा, असे धोरण हवे. सुरक्षेशी संबंधित माहिती तंत्रज्ञानात तत्परता, क्षमता व समन्वय यांचा अभाव दूर झाला पाहिजे. आपल्या सीमांचे संरक्षण करण्याची व्यवस्था सुदृढ झाली पाहिजे. सामरिक व्यवस्थापन व संरक्षण व्यवस्था, याचबरोबर आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मुत्सद्देगिरीवरही सीमा सुरक्षा अवलंबून असते. त्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी ‘लूक ईस्ट पॉलिसी’ नावाचा वाक्यप्रयोग उच्च शासकीय अधिकाऱ्यांनी वापरात आणला. भारत आणि आपले राष्ट्रजीवन यांची पायाभूत मूल्ये समान आहेत आणि इतिहासकाळापासून सांस्कृतिक व व्यापारी दृष्टीने देवाणघेवाण करण्याविषयी घनिष्ठ संबंध आहेत, असे दक्षिण-पूर्व आशियातील सर्व देश मानतात. या सर्व देशांशी मैत्रिपूर्ण संबंध वाढविण्याचा सरकारने निश्चय केला आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ही घोषणा ज्या गतीने वास्तवात येत आहे, ती गती फारशी आशादायक नाही. या क्षेत्रात आपला स्पर्धक बनून चीन संपूर्ण शक्तीनिशी आधीच उतरला आहे, ही गंभीर चिंतेची बाब आहे. चीनने आपले अणुतंत्रज्ञान पाकिस्तानला देण्याइतपत त्याच्याशी मैत्री साधली आहे. नेपाळ, श्रीलंका व ब्रह्मदेश या देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक बहुसंख्येने आहेत. त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या परंपरागत स्वाभाविक मित्रदेशांना आपल्या सोबत राखण्याची दृष्टी आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभावी बनली पाहिजे.

जम्मू-काश्मीरच्या समस्येबाबत गेल्या 10 वर्षात अवलंबलेल्या धोरणामुळे तेथे दहशतवादी शक्ती आपले डोके पुन्हा वर काढत आहे. पाकिस्तानच्या ताब्यातून काश्मीर खोऱ्याचा भूभाग मुक्त करणे, जम्मू, लेह-लडाखमधील व खोऱ्यातील प्रशासन व विकास यांचा भेदभाव संपवून उर्वरित भारतासोबत त्यांच्या सात्मिकरणाच्या प्रक्रियेला शीघ्रतेने पूर्णत्वास नेणे; खोऱ्यातून विस्थापित झालेल्या हिंदूंना सन्मानाने पुन्हा तेथे वसविणे; फाळणीच्या वेळी भारतात आलेल्या निर्वासितांना नागरिकत्वाचा अधिकार देणे, इत्यादी न्याय्य अपेक्षांची पूर्तता करण्याऐवजी तेथे आणखी घोळ घालण्याचे कार्य सुरू आहे.

देशाच्या पूर्वेकडील भागाची परिस्थिती पाहता, राष्ट्रीय वृत्तीच्या हिंदूंची लोकसंख्या घटल्यामुळे देशाच्या उत्तर भागात निर्माण झालेल्या समस्यांवरून आपण कोणताही बोध घेतलेला नाही, असेच दिसून येते. आसामच्या आणि बंगालच्या सीमेवरून होणारी घुसखोरी, बनावट नोटांची आणि अमली पदार्थांची तस्करी याबद्दल आम्ही वेळोवेळी इशारे दिले आहेत. देशाच्या गुप्तचर संस्थांनी, न्यायालयांनी आणि राज्यांच्या राज्यपालांनीसुध्दा वेळोवेळी भयसूचक घंटा वाजविलेली आहे. त्याकडे काणाडोळा करून लांगूलचालनाचे धोरण अवलंबल्यामुळे ईशान्य भारतात विक्राळ संकट उभे ठाकले आहे. घुसखोरीमुळे तेथील राष्ट्रवादी प्रवृत्तीची लोकसंख्या घटलेली आहे. व्यापक धर्मांतरामुळे तेथे फुटीरतावादाच्या व दहशतवादाच्या विषवल्लीला सरकारचे बोटचेपे धोरण वारंवार खतपाणी घालत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन अल कायदासारख्या धर्मांध शक्ती तेथे चंचुप्रवेश करू पाहत आहेत. तेथे आपल्या समर्थ सशस्त्र बलाची उपस्थिती, प्रतिकारासाठी जनतेचे सुदृढ मनोबल हेच सुरक्षेचा आधार आहेत. ईशान्य भारतात व अन्य राज्यांतही शिरलेल्या घुसखोरांना वेळीच ओळखून त्यांची देशातून हकालपट्टी केली पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचा गडबड, गोंधळ होऊ नये यासाठी दक्षता घेतली पाहिजे. राष्ट्रीय नागरिक सूची (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) योग्य पुराव्यानिशी तयार करायला हवे. परंतु अनुभव असा येतो की देशातून घुसखोरांची हकालपट्टीची कारवाई करण्याचा देखावा जेव्हा शासनाने केला, तेव्हा त्यांच्या पकडीतून बांगला देशी घुसखोर सहीसलामत सुटले; मात्र तेथील गांजलेल्या आणि भारतात येऊन वसलेल्या अनेक निरुपद्रवी व निरपराध हिंदूंची विनाकारण परवड झाली.

परंपरेने हिंदुस्थान म्हणून ओळखला जाणारा भारत हीच जगभरातील हिंदू समाजासाठी पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे, ही गोष्ट सर्वांनी स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे आणि मान्य केली पाहिजे. हिंदूंचा प्रभाव आणि संख्या जेथे घटली, त्या भूभागांची नावे बदलली गेली आहेत. आपल्याच देशातून त्याला हाकलून लावले तर त्याला आश्रय घेण्यासाठी पृथ्वीतलावर दुसरा देश नाही. त्यामुळे अन्य देशांतून निर्वासित होऊन भारतात परतणाऱ्या हिंदूंना विदेशी म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे सिंधमधून असो की बांगला देशातून असो – अत्याचारांनी गांजल्यामुळे नाइलाजाने भारतात आलेल्या निर्वासित हिंदूंना आदराने आणि स्नेहाने स्वीकारले पाहिजे. जगभरातील हिंदूंच्या हितांच्या संरक्षणासाठी शासनाने तत्परतेने अपेक्षित भूमिक पार पाडली पाहिजे.

घुसखोरांना हाकलून लावण्याची कारवाई होते, तेव्हा केवळ ते आपल्या संप्रदायाचे आहेत म्हणून त्यांची पाठराखण करण्याचे वातावरण काही घटकांनी तयार केले आहे. शिक्षणासाठी आणि नोकरी-धंद्यासाठी भारताच्या विविध भागात आलेल्या पूर्वांचलातील बांधवांना धमक्याही देण्यात आल्या आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावरील घटना कुप्रसिध्द आहे. अमर जवान ज्योतीची विटंबना करणाऱ्यांचा अभिमान बाळगणारे घटक देशात अजूनही टिकून आहेत, हा आपल्यासाठी गंभीर इशारा होय. परंतु सत्तास्थानी असलेली आपलीच माणसे देशविरोधी घटकांना थैमान घालण्यास खुली मुभा देण्याचे धोरण राबवीत आहेत, हे दुर्दैवच होय. समाजात राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणे तर दूरच, मतांच्या लोभाने धर्मांधतेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आपल्या परमश्रध्देय आचार्यांवर खोटेनाटे आरोप लावून त्यांची मानहानी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. वनवासी बांधवांची सेवा करणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची भेकडपणे हत्या करण्यात आली. गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. हिंदू मंदिरांच्या अधिग्रहित संपत्तीचा अपहार आणि दुरुपयोग होत आहे. हिंदू संतांनी स्थापन केलेले न्यास व तिरुअनंतपुरममधील पद्मनाभ स्वामी मंदिरासारख्या मंदिरांतील संपत्तीविषयी हिंदू समाजातील धारणा, श्रेष्ठ परंपरा आणि संस्कार यांना कलुषित करणारे विषय समाजात जाणूनबुजून पसरवले जात आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि घटनेचा आदर बाळगण्याचा दावा करणारे लोक मतांच्या लोभापोटी ”या राष्ट्रातील संपत्तीवर अल्पसंख्याकांचाच पहिला हक्क आहे” असे बेधडकपणे सांगून धार्मिक आधारावर आरक्षणाची पाठराखण करीत आहेत.

‘लव्ह जिहाद’च्या आणि धर्मांतराच्या माध्यमातून हिंदू समाजावर छुपे आक्रमण करणाऱ्या प्रवृत्तींशी राजकीय हातमिळवणी केली जात आहे. त्यामुळे आमच्या बाजूने बोलणारे आणि आमचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व या देशात अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न हिंदू जनतेसमोर उभा ठाकला आहे. हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांचे नामोनिशाण मिटवून टाकणाऱ्या एकाधिकारवादी, भौतिकवादी व धर्मांध शक्ती आणि आपले केंद्र व राज्य सरकारे यांमध्ये ठाण मांडून बसलेली मतलोलुप, संधिसाधू प्रवृत्ती यांच्या अभद्र युतीला मदत पुरवली जात आहे.

श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या परिसरातील विस्तृत जमीन ताब्यात घेऊन तेथे मोठी इमारत उभी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कानावर येते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा गोष्टी करून समाजाच्या भावनांशी खेळ केला तर धार्मिक सौहार्दाची भावना धोक्यात येईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर 2010 रोजी दिलेल्या निर्णयानुसार, रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाला तेथे भव्य मंदिर उभारण्याची परवानगी देण्यासाठी संसदेने लवकरात लवकर कायदा करावा आणि अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी मुसलमानांसाठी एखादे बांधकाम व्हावे, हाच या विवादात घुसलेल्या राजकारणाला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा व संतोषजनक आणि सौहार्दपूर्ण मार्गाने प्रश्न सोडविण्याचा एकमेव उपाय आहे.

मोठमोठया विदेशी कंपन्या किरकोळ व्यापार क्षेत्रातही गुंतवणूक करीत आहेत, हा चांगला अनुभव नव्हे. किरकोळ व्यापारात व विमा व निवृत्तिवेतन क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्यामुळे आपल्याला लाभ होण्याऐवजी छोटे व्यापारी बेरोजगार होणे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा कमी भाव मिळणे आणि ग्राहकांसाठी महागाई वाढणे, हेच परिणाम होणार आहेत. देशाच्या नैसर्गिक संपदेची बेकायदेशीर लूट होणे आणि जैवविविधतेवर आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी बेरोजगारीपासून विस्थापनापर्यंत विविध समस्या निर्माण झालेल्या आहेतच. केवळ मूठभर लोकांच्या विकासाला देशाची आर्थिक प्रगती संबोधणे व विकास दर वाढत असल्याची भलामण करणे सुरू होते. पण तो दरही 9 टक्कयांहून 5 टक्कयांवर घसरला आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमतेची दरी अधिकच रुंदावली आहे. यावर मात करण्यासाठी पुरेसा विचार न करता अपक्व कायदे संमत केले जात आहेत आणि त्याउलट निवडणूक पध्दत, करपध्दत, आर्थिक परीक्षण, शैक्षणिक धोरण, माहिती अधिकाराचा कायदा या क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या जाव्यात, या रास्त मागणीकडे काणाडोळा केला जात आहे. जगात अर्धवट विचारांती ज्या विकास प्रक्रियेची दिशा धरली आहे, तेथे सर्वत्र असेच परिणाम दिसून आलेले आहेत. धनदांडग्या बहुराष्ट्रीय आस्थापनांना अनुकूल धोरण राबवले जात आहे. समग्र व एकात्म दृष्टिकोनाच्या आधारावर आपली क्षमता, आवश्यकता आणि साधनसामग्री यांना अनुरूप व्यवस्थांचे नवीन कालसुसंगत नमुने जोपर्यंत आपण विकसित करणार नाही, तोपर्यंत भारताला सर्वांसाठी फलदायी ठरणारा संतुलित विकास आणि प्रगती साधता येणार नाही; तसेच अपूर्ण विसंवादी जीवनापासून जगाची मुक्तता होणार नाही. देशातील राष्ट्रीय आणि व्यक्तिगत चारित्र्याचा अभाव दिसून येतो. मनाला सुन्न करून टाकणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे सतत उघडकीस येतात. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा ठोठावणे आणि विदेशात दडवलेला काळा पैसा देशात परत आणणे, यासाठी लहानमोठी आंदोलने केली जात आहेत. पण शील आणि चारित्र्य यांच्या अभावामुळे भ्रष्टाचार फैलावतो, हे ध्यानात घेऊन संघाने चारित्र्यनिर्माणाच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांच्या मनात निराशा आणि देशातील व्यवस्थेविषयी असंतोष न माजवता परिवर्तन घडवून आणावे लागणार आहे. अन्यथा मध्य-पूर्वेतील देशांमध्ये अराजक माजवून धर्मांध आणि विदेशी शक्तींनी आपली पोळी भाजून घेतली होती, तशी शक्यता नाकारता येत नाही. व्यापक चिंतनाच्या आधारावर मूलगामी आणि दूरगामी परिणाम घडवून आणावे लागणार आहेत. जातीय अभिनिवेश, मागास आणि वंचित घटकांचे शोषण, कन्या भ्रूण हत्या, स्वैराचार, मोडकळीस आलेली कुटुंबव्यवस्था, व्यसनाधीनता अशा घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. शाश्वत मूल्यांच्या आधारावर समाजात नवरचना निर्माण करण्यासाठी कालसुसंगत व्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे राजकारणी, शासन आणि प्रशासन यांच्या डोक्यावर सगळी जबाबदारी टाकून आपण हात झटकू शकत नाही. आपण आपल्या घरापासून समाजापर्यंत स्वच्छता, सुव्यवस्था, स्वयंशिस्त, उचित व्यवहार व शुचिता, संवेदनशीलता इ. सुदृढ राष्ट्रजीवनासाठी आवश्यक व्यावहारिक बाबींचे दर्शन घडवतो का? आपल्या स्वतःच्या जीवनातील दृष्टिकोनाने आणि आचरणानेच सर्व प्रकारच्या परिवर्तनाचा आरंभ होतो, हे विसरून केवळ आंदोलने केल्याने हेतू साध्य होणार नाही.

महात्मा गांधींनी 1922च्या ‘यंग इंडिया’च्या एका अंकात सात सामाजिक पापांचा उल्लेख केला आहे. ती म्हणजे, तत्त्वहीन राजनीती (पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स), श्रमाविना संपत्ती (वेल्थ विदाऊट वर्क), विवेकहीन उपभोग (प्लेजर विदाऊट कॉन्शिएन्स), शीलविना ज्ञान (नॉलेज विदाऊट कॅरेक्टर), नीतिशून्य व्यापार (कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी), मानवता विरहित विज्ञान (सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी) आणि त्यागरहित पूजा (वर्कशिप विदाऊट सॅक्रिफाइस).

आपल्या देशाच्या सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचेच हे वर्णन वाटते. अशा परिस्थितीत समाजातील सज्जनशक्तीलाच समाजात, तसेच समाजाला सोबत घेऊन उद्यम करावे लागते. या आव्हानाचा स्वीकार करून आपल्याला पुढे जावेच लागेल. भारतीय नवोत्थानाच्या ज्या उद््गात्यांकडून प्रेरणा घेऊन महात्मा गांधींसारखे कर्तृत्ववान लोक काम करत होते, त्यांपैकी एक स्वामी विवेकानंद होते. येत्या काही दिवसांपासून स्वामीजींच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम सुरू होईल. आपण त्यांच्या संदेशाचे पालन केले पाहिजे. निर्भयतेने, आत्मसन्मानाने आणि आत्मविश्वासाने शुध्द चारित्र्याची साधना केली पाहिजे. जनता हा जनार्दन मानून तिची निःस्वार्थपणे सेवा करण्यासाठी कठोर परिश्रम करत धर्मप्राण भारताला जागृत करावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व गुणांनी युक्त व्यक्तींच्या निर्मितीचे कार्य करीत आहे. हे कार्य ही काळाची अनिवार्य गरज आहे. आपल्या सर्वांना यात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागेल. निरंतर साधना आणि कठोर परिश्रम यांमुळे समाज अभिमंत्रित होऊन संघटित कार्यासाठी तयार होईल, तेव्हा सर्व अडथळयांना भेदत समुद्राच्या दिशेने धावणाऱ्या गंगेप्रमाणे राष्ट्राचा भाग्यसूर्यही उदयाचलाहून शिखराकडे प्रयाण करण्यास सुरुवात करील. म्हणूनच स्वामीजींच्या शब्दात सांगायचे तर ”उठा, जागृत व्हा आणि तोपर्यंत न थांबता परिश्रम करत राहा, जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करत नाही.”
उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्यवरान्निबोधत!!
४ नोहेंबर २०१२

0 comments:

Post a Comment